mh 13 news network
सोलापूर – (प्रतिनिधी)
केंद्र व राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरीव विकास झाला असून, सोलापूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता येणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजारोंच्या साक्षीने दिला.

सोलापूर महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेला लाडक्या बहिणींसह नागरिकांची रेकॉर्डब्रेक उपस्थिती लाभली. सभामंडप गर्दीने ओसंडून वाहत होता.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली असून लाडक्या बहिणी समाधानी आहेत. स्मार्ट सिटी, विमानसेवा, आयटी पार्क आणि नियमित पाणीपुरवठ्यासारखी कामे भाजप सरकारने केली आहेत. वानकर परिवार भाजपमध्ये आल्यामुळे प्रभाग ६ चा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वानकर परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश हा विकासाच्या विचारातून झाल्याचे सांगत, “आता प्रभाग ६ मधून भाजपच निवडून येणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला. ही प्रचारसभा नसून विजयी सभाच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष मनिष देशमुख, प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांच्या आगमनावेळी परिसर जय श्रीराम आणि वंदे मातरम् घोषणांनी दणाणून गेला.
आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, विरोधात राहून विकास शक्य नाही, ही जाणीव झाल्यामुळे वानकर परिवार सत्तेसोबत म्हणजेच भाजपसोबत आला आहे. प्रभागाचा विकास हेच अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी “शत-प्रतिशत भाजप”चा नारा दिला, तर उमेदवार सुनील खटके व मृण्मयी गवळी यांनी प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी वानकर परिवारातील तिसरी पिढी – समर्थ, विश्वजीत आणि अभय वानकर यांनी भाजपसोबत जनसेवेची सुरुवात केली. त्यांच्या प्रवेशाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले की, यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढविणार असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.








