९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान संपाचा इशारा – मेस्मा लागू; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – महावितरणचा इशारा
मुंबई, दि. ८ :
महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या काळात राज्यभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण करण्यात आले असून, सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

महावितरण प्रशासनाने गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळता सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या असून, रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“वीज ही अत्यावश्यक सेवा, संप बेकायदेशीर” – महावितरण
व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा आणि आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केला आहे. त्यामुळे हा संप बेकायदेशीर ठरल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज
संपाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पर्यायी यंत्रणा रात्रंदिवस युद्धपातळीवर कार्यरत राहणार आहे.
महावितरणकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये.
तक्रारींसाठी २४ तास हेल्पलाईन
वीजपुरवठ्याशी संबंधित कोणतीही तक्रार अथवा शंका असल्यास नागरिकांनी खालील टोल फ्री क्रमांकांवर २४ तास संपर्क साधावा :
📞 १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५
तसेच, संपकाळात वीजसेवा देणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.