इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
स्व. अप्पासाहेब वारद यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त इंट्याक सोलापूर विभाग आणि सोलापूर महापालिकेचा संयुक्त उपक्रम
सोलापूर/ प्रतिनिधी
दिनांक २८ जून २०२५ रोजी स्व. अप्पासाहेब वारद यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त इंट्याक सोलापूर विभाग आणि सोलापूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘इंद्रभुवन वारसा फेरी ( हेरिटेज वॉक) आयोजित करण्यात आली. सकाळी या वारसा फेरीची सुरुवात स्व. आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी स्व. वारद यांचे वारस महेंद्र वारद व मल्लिकार्जुन पाटील आदी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करताना इंट्याक सोलापूर विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी संस्थेची माहिती देत, ऐतिहासिक वारसा याचं जतन व संवर्धन करण्याची आजची आवश्यकता विशद केली.

आजच्या औचित्य प्रसंगी स्व. वारद यांना स्मरण करत सोलापुरातील हा अमूल्य ठेवा अशा उपक्रमांमधूनच सोलापूरच्या या वारशाचे जतन व संवर्धन होईल, अशी आम्हाला आशा आहे असे म्हणाले.
या वारसा फेरीची सुरुवात इतिहास तज्ञ व वास्तू अभ्यासक आर्कि. सीमंतिनी चाफळकर यांनी स्व. वारद यांची कहाणी तथा या इमारतीची उभारणी संदर्भातली बारकाव्यासह इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर एकेक करीत वास्तुकलेचे वेगवेगळे बारकावे, त्याचं बाह्य स्वरूप वास्तुशैली व त्या अनुषंगाने असणारे त्याचे महत्त्वही सांगितले. इमारतीच्या बाहेरील दर्शनी भागातील तथा पोर्च मध्ये असलेले शिल्प, कलाकुसर इत्यादींचीही सविस्तर माहिती देण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेने इमारत आतून पाहण्याची संधी दिल्यामुळे आतील सर्व संरचना, त्यातील वास्तु- बांधकाम अनुषंगाने असलेले नक्षीकाम, तपशील, विविध संसाधनांचा सुयोग्य वापर, दगड, लाकूड, काच इत्यादी बाबत देखील माहिती देण्यात आली. या फेरीमध्ये स्व. अप्पासाहेब वारद यांचे सोलापूरच्या विकासातील योगदान, त्यांची सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व वास्तुशिल्पिक योगदानाची माहिती सविस्तरपणे विशद केली.

“इंद्रभुवन” सारख्या ऐतिहासिक वास्तूतून चालत-चालत, त्या काळातील संस्कृती, परंपरा आणि विचार यांचा अनुभव नागरिकांना घेता आला. यावेळी आर्कि. श्वेता कोठावळे व इतिहास तज्ञ नितीन अनवेकर यांनी इमारतीच्या आतील भागांची अधिक माहिती देताना, त्यावेळी असलेला जागेचा अपेक्षित वापर, एकूणच उपयुक्तता, बांधकाम अनुसरून व ऐतिहासिक अंगाने संदर्भ दिले. वारसा फेरीच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व नागरिकांना हरित सोलापूरच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल या अनुषंगाने त्यांना पर्यावरणपूरक स्मृतिचिन्ह म्हणून ‘गोकर्ण रोप’भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. हा हेरिटेज वॉक खूप आनंददायक व सोलापूरच्या समृद्ध इतिहासाची जाणीव करून देणारा ठरला असे मत अनेक सहभागींनी सरते शेवटी व्यक्त केले.
सुमारे दोन तास चाललेल्या या वारसा फेरीसाठी आर्कि. श्वेता कोठावळे, आर्कि. पुष्पांजली काटीकर, विकास कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. या वारसा फेरीमध्ये सिद्धाराम चाकोते, डॉ. संध्या रघोजी, शांता येळंबकर, प्रा. डॉ. संगीता बावगे, असीम चाफळकर, श्रीरंग रेगोटी, प्रा. लक्ष्मी रेड्डी, शिव बागलकोटे, कुमार मिरजकर, आशिष मोरे, प्रविण इंदापूरे, योगेश जक्कल, जिनपाल बिराजदार, शालिनी मोरे, चंद्रकांत मोरे, श्रीनिवास येले, अर्चना दासरी, सर्वेश कुलकर्णी यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.