MH13NEWS network
सोलापूर, दि. १ जुलै : बनावट सातबारा उताऱ्याच्या आधारे खोटे खरेदीखत तयार केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन तलाठी मुकुंद रामचंद्र राजूपाध्याय यांना कोल्हापूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायमूर्ती मेहरोझ पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

प्रकरणातील माहितीनुसार, करमाळा येथील गट क्रमांक ३९४ संदर्भातील खरेदीखत (दस्त क्र. २४१०/२००७) तत्कालीन दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले होते. या व्यवहारात संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर रमेश गायकवाड, वत्सलाबाई सोनवणे आणि चंद्रलीला साळवे हे जिवंत असतानाही त्यांना १० ते १५ वर्षांपूर्वी मृत झाल्याचे दाखवून बनावट सातबारा तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्या आधारे खोटे खरेदीखत तयार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सहाय्यक निबंधक अरविंद सूर्यकांत कोकाटे यांनी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, अटक टाळण्यासाठी मुकुंद राजूपाध्याय यांनी प्रथम बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने अर्जदाराचा गुन्ह्यातील सहभाग मर्यादित स्वरूपाचा असून, त्याच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने ₹५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. रितेश थोबडे व ॲड. निखिल पाटील यांनी, तर सरकार पक्षातर्फे ॲड. आश्विनी टकळकर यांनी काम पाहिले.








