MH 13 NEWS NETWORK
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत असताना सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा युवाकेंद्रित, शेतकरीहिताचा आणि सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत केलेल्या ठोस तरतुदी भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या ठरणार आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी जाहीर झालेल्या मेट्रो प्रकल्पांसाठीच्या तरतुदी, मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, तसेच मुंबई–पुणे व पुणे–हैदराबाद उच्चगती रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल. शहर विकास, नदी पुनरुज्जीवन, कृषी व्यवसाय नेटवर्क आणि ग्रामीण जोडसुधार प्रकल्पांसाठी मिळालेला निधी महाराष्ट्राच्या समतोल विकासाला बळ देणारा आहे.
आरोग्य क्षेत्रातील बायोफार्मा धोरण, कॅन्सर व मधुमेहावरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय, तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी ४० हजार कोटींची तरतूद ही भारताच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरेल. हा अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.








