सोलापूर (प्रतिनिधी) :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ जिल्हा परिषद गटात ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांची निवडणूक मोहीम दिवसेंदिवस बळकट होत असून त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. अपक्ष उमेदवार जावेद पटेल व शिवाजी बापू नन्नवरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने साठे यांच्या विजयाच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या असून गटातील राजकीय समीकरणे त्यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून साठे हे तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. पक्षभेद न करता सर्वसामान्यांची कामे करण्याची त्यांची ओळख निर्माण झाली आहे. दररोज जिल्हा परिषदेत उपस्थित राहून नागरिकांची कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. लोकांच्या आग्रहास्तवच निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुरोगामी विचार टिकून राहावेत आणि स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व मिळावे या भूमिकेतून जावेद पटेल यांनी साठे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे आणि समाजकारणातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शिवाजी बापू नन्नवरे यांनीही साठे यांच्या प्रचारात सहभाग घेत समर्थन दर्शविले आहे.
या घडामोडींमुळे बीबी दारफळ गटात साठे यांचे पारडे जड झाले असून निवडणुकीत त्यांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.







