“मातीला पंख फुटताना” ही कुमार कादंबरी अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्य यांच्या काळोखाला भेदून प्रकाशमान वाटेवर येणाऱ्या शाळकरी मुलीच्या जिद्दीची कहाणी सांगते. ही कहाणी समाजातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, हेच या पुस्तकाचे खरे यश आहे. असे विचार साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले. मोहोळच्या लेखिका डॉ. स्मिता पाटील लिखित “मातीला पंख फुटताना”, या कादंबरीचे आणि “नाही गिरवता येत कुठलीच लिपी” यादुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे होते. याप्रसंगी कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, डॉ. प्रमोद पाटील यांची या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती होती. आपल्या पुस्तकातून ग्रामीण भागातील स्त्रियांचे विदारक चित्र मांडले आहे. तरुण मुलांच्या भावविश्वाची चपखल मांडणी केली आहे, असे श्रीकांत पाटील म्हणाले.

श्रीकांत मोरे यांनी लेखिका स्मिता पाटील यांचे कौतुक करत माणूस नुसताच भौतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. परंतु सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या कोताच राहिल्याची खंत व्यक्त करत ही कविता केवळ स्त्रीच्याच नव्हे तर माणूसपणाला नकार देणाऱ्या सर्वच व्यथांना आपल्या विश्वात सामावून घेत एक नवा सम तावादी समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहते. असे सांगितले.

प्रास्तविक डॉ. स्मिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी केले तर आभार डॉ. प्रमोट पाटील यांनी मानले. यावेळी उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, डॉ. नसीम पठाण, जे. जे. कुलकर्णी कवी मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे, राजेंद्र भोसले, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. श्रुती वडगबाळकर, वंदना कुलकर्णी, दिगंबर भगरे, डॉ. सुहास पुजारी उपस्थित होते