MH13NEWS network
सोलापूर : महापालिकेतील सत्तास्थापन प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजकीय चातुर्य दाखवत भाजपातील गटतट सांभाळून सर्व समाजाला न्याय देणारा निर्णय घेतला आहे. महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता या तीनही महत्त्वाच्या पदांवर समतोल साधत भाजपात अंतर्गत एकजूट निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले.
महापौरपदी विनायक कोंड्याल, सभागृह नेता म्हणून नरेंद्र काळे आणि उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करताना सामाजिक प्रतिनिधित्वाबरोबरच गटातील समन्वय जपण्यात आला आहे. देशमुख आणि कोठे गटांमधील संघर्ष टाळत पालकमंत्री गोरे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक यश मिळवत १०२ पैकी ८७ जागा जिंकल्या. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार लॉबिंग सुरू होते. मराठा, धनगर, पद्मशाली समाजांनी महापौरपदावर दावा केला होता. त्याचवेळी भाजपातील गटतट उघडपणे समोर येऊ लागले होते.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी प्रथम सभागृह नेता म्हणून धनगर समाजाचे नरेंद्र काळे यांची निवड करत राजकीय खेळी केली. संघटनात्मक अनुभव आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची प्रतिमा पाहता हा निर्णय सर्वमान्य ठरला. दक्षिण मधील देशमुख यांच्यानंतर नरेंद्र काळे यांचे उत्तर मधील आमदार देशमुखांशी असणारे सख्य प्रसिद्ध आहे.
यानंतर महापौरपदासाठी पद्मशाली समाजाचे विनायक कोंड्याल आणि उपमहापौरपदासाठी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करत सामाजिक समतोल साधण्यात आला. देशमुख गटाशी संबंधित असूनही देवकर यांना संधी देत गोरे यांनी पक्षहिताला प्राधान्य दिल्याचे दाखवून दिले.
यापुढे स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि शिक्षण मंडळ यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरही सर्वसमावेशक धोरण राबवले जाण्याची शक्यता आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांसह नव्यांना संधी देत भाजपातील अंतर्गत मतभेद संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे.

दोन्ही तगडे गट बॅकफूटवर…!
एका आमदारांनी महापालिका निवडणूकीत काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले तर काही ठिकाणी भाजपा विरोधी उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे असलेले आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा वगळता संपूर्ण निवडणूकीत कुठेच दिसले नाहीत. याची मोठी चर्चा निवडणूक काळामध्ये भाजपातील निष्ठावंत, अधिकृत उमेदवारांमध्ये पसरली होती.
यामुळे दोन्ही आमदारव्दय देशमुखांवर पक्षश्रेष्ठ नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सांगून केल्याची कबुली देत भाजपामध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. एवढे मोठे यश संपादन करुनही केवळ गटतट न पाहता देशमुख समर्थकांनाही मानाची पदे देवून ना. गोरे यांनी वैयक्तीक हेवेदावे नसल्याचे सिध्द केले.
गटतट, समाजकारण आणि पक्षहित यांचा समतोल साधत जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेतील सत्तास्थापन प्रक्रियेत राजकीय परिपक्वतेचा ठसा उमटवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.








