MH 13 News
स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक; निष्ठावंतांना संधी, भविष्यासाठी भक्कम व्यूहरचना
सोलापूर – जयकुमार गोरे यांनी महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत टाकलेली चाल राजकीय वर्तुळात ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून चर्चेत आहे. एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देताना दुसरीकडे आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून सामाजिक आणि राजकीय समतोल साधल्याचे या निवडीवरून स्पष्ट दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या डॅशिंग आणि फास्ट डिसिजनमुळे शहरातील राजकारणामध्ये भले भले.. गार केले गंमतमधी..! हे गाजलेले रील पालकमंत्री गोरेंच्या ट्रिगर ॲक्शन सह प्रचंड व्हायरल होत आहे..

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांनी सर्व सूत्रे स्वतः हाती घेतली होती. त्यांच्या नियोजनबद्ध रणनीती आणि शहर भाजपाच्या परिश्रमामुळे १०२ पैकी तब्बल ८७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला. प्रमुख विरोधी काँग्रेससह इतर पक्षांची दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीतही त्यांनी पॉवरबाज खेळी केल्याचे बोलले जात आहे.

या निवडीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, ज्ञानेश्वर म्याकल, रुद्रेश बोरामणी, श्रीनिवास दायमा, वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, ॲड. ऋतुराज (ऋषिकेश) मेट्रे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची वर्णी लागली आहे. विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देत लिंगायत, पद्मशाली, मोची, मराठा आणि व्यापारी मारवाडी समाजाचा समावेश करण्यात आल्याने आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचना आत्तापासूनच सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

रोहिणी तडवळकर या दोन पिढ्यांपासून भाजपशी निगडित आहेत. त्यांचे वडील जनसंघाचे कार्यकर्ते होते, तर पती राम तळवळकर यांनी आणीबाणीत कारावास भोगला. त्या यापूर्वी महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या आणि सध्या शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
रुद्रेश बोरामणी यांनी १९९६ पासून भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. शिक्षण मंडळ सदस्य ते शहर संघटन सरचिटणीसपर्यंत त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.
ज्ञानेश्वर म्याकल आणि श्रीनिवास दायमा हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले असून संघटन आणि नियोजन कौशल्यासाठी ओळखले जातात.
अक्षय अंजीखाने यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकीर्द सुरू करून भाजयुमोमध्ये विविध पदांवर काम केले आहे.
वृषाली चालुक्य या जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहिल्या असून प्रचारात सक्रिय भूमिका बजावली.
ऋषिकेश मेट्रे हे मोची समाजातील उच्चशिक्षित वकील व सामाजिक कार्यकर्ते आहेत.
मनीष केत हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. शहर आणि जिल्ह्याची त्यांना दांडगी माहिती आहे. मराठी राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सकारात्मक पत्रकारितेसाठी आग्रही, अनेक सामाजिक कामांत आणि पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करतात. माध्यम प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी त्यांची वर्णी लागली आहे.
शहरात लिंगायत, पद्मशाली, मोची, मराठा आणि व्यापारी असलेल मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देत आम्ही निवडणुकांसाठी व्यवरचना आत्तापासून सुरू केल्याचे दिसते.
शहरातील तिन्ही आमदारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाला दीर्घकालीन उपयोगी ठरणाऱ्या आणि संघटन बळकट करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देत पालकमंत्री गोरे यांनी भविष्यातील निवडणुकांसाठी भक्कम पायाभरणी केल्याचे भाजप कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.







