MH 13 News network
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून आरोपी गणेश लक्ष्मण ढोबळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी पंढरपूर येथील सेशन्स न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
दि. ११ मार्च २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास गुंजेगाव (ता. मंगळवेढा) येथे रिना आप्पासाहेब ढोबळे आणि चंद्रकांत तात्यासाहेब पाटील यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पूर्ववैमनस्यातून लोखंडी कोयता, हातोडा व पाईपने हल्ला करून दोघांची हत्या केल्याचा आरोप गणेश ढोबळे यांच्यासह सात जणांवर ठेवण्यात आला होता. मंगळवेढा पोलिसांनी या घटनेनंतर तपास करून संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, मयत रिना ढोबळे यांचे पती सुमारे पाच वर्षांपूर्वी निधन पावले होते. त्यानंतर त्या चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राहत होत्या. दरम्यान, शेजारील शेतकरी लक्ष्मण ढोबळे यांच्यासोबत पाईपलाईनच्या चेंबरच्या कारणावरून त्यांचा वाद सुरू होता. या वादातून दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वैमनस्यातूनच हा दुहेरी खून झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला होता.

आरोपी गणेश ढोबळे यांचा जामीन अर्ज प्रथम पंढरपूर सेशन्स कोर्टात सादर करण्यात आला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आरोपीच्या सहभागाबाबत साक्षीदारांच्या जबाबात गंभीर विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या विसंगतींचा विचार करून न्यायालयाने गणेश ढोबळे यांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी प्रभावी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲड. एन. बी. पाटील यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, या निर्णयामुळे परिसरात पुन्हा एकदा या खटल्याबाबत चर्चा सुरू झाली असून पुढील सुनावणीदरम्यान या प्रकरणातील इतर बाबींवर काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







