MH13 News Network
मुंबई / सोलापूर : सोलापूर शहरातील भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे राहणाऱ्या समर्थ योगीनाथ स्वामी (वय ९) या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यानंतर रेबिजमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी मंगळवारी (दि. २८ जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडे सविस्तर निवेदनही सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २३ जुलै २०२६ रोजी समर्थ स्वामी याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबिजने मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून मयत बालकाचे वडील कॅन्सरग्रस्त आहेत. समर्थ हा त्यांच्या कुटुंबातील एकमेव अपत्य होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हालाखीची असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यावर मानसिक आणि आर्थिक असे दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे मानवीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रस्ताव सोलापूर प्रशासनाकडून तातडीने मागवून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनीही प्रस्ताव तातडीने मागवून संबंधित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते.

याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “समर्थसारख्या निरागस चिमुकल्याचा मृत्यू ही संपूर्ण सोलापूरकरांच्या मनाला चटका लावणारी आणि अत्यंत वेदनादायी घटना आहे. या दुर्दैवी घटनेने मला वैयक्तिकरित्या अस्वस्थ केले. त्यामुळे आज महापौर विनायक कोंड्याल यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समर्थच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी निवेदन सादर केले. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेत संबंधित विभागाला प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुमारे पाच लाख रुपयांची मदत मिळण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. भविष्यात सोलापूरमध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”
सोलापूरकरांची प्रतिक्रिया..!
“अवघ्या नऊ वर्षांच्या समर्थचा अकाली अंत हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण सोलापूरच्या मनाला चटका लावणारा प्रसंग ठरला. आता त्याच्या कुटुंबाला आधार देतानाच भविष्यात अशा कोणत्याही निरागस जीवाचा बळी जाऊ नये, हीच सोलापूरकरांची अपेक्षा आहे.”








